Saturday, February 11, 2012

मला हे दत्तगुरू दिसले


३० जाने २०१२

आज दत्तजयंती होती, तशी कामाला सुट्टी नव्हती परंतु खूप वेळ होता संध्याकाळी. हा लेख लिहिण्याचा मानस म्हणजे मी अनुभवलेला काळातील व जागतिक मानसिकतेतील बदल किंवा त्याची एक अनुभूती. दरवर्षीप्रमाणे विभागातील भजनी मंडळ त्यात मी हि एक भाग होतो, दोन ठिकाणी भजनाचा कार्यक्रम करणार होतो. एका ठिकाणी चाळीत तर दुसऱ्या ठिकाणी उच्च्प्रभू इमारतीत. चाळीत भजन एक आदर्श अचारसरणी किंवा एक सामाजित आदर्श व मान होता. तसे चाळीत खूप स्वागत झाले, लोकं आवडीने भजन ऐकत होते. इथे बहुसंख्य अशी अवस्था होती. तसे पाहिल्यास त्या चाळीत हि श्रीमंत लोकं होतीच, त्यांचे संस्कार कि काही माहित नव्हते परंतु ते भजनात आवर्जून बसतात व साथ देतात, त्यांना बहुतेक अभंग हि पाठ असतात हि वस्तुस्थिती. अशा लोकांचा देव पूजेतील सहभाग खूप मोठा असतो. तसेच समाजकारणात हि आधुनिक विचारसरणी असते. फरक एवढाच असतो कि असे लोक चाळीत राहतात कारण ते त्या समाजाला विसरू शकत नाहीत, ते तेथेच वाढलेले असतात व इतर लोकांची त्यांना सवय झालेली असते. चाळीत भजन खूप रंगले, महत्वाचे म्हणजे एक वयस्कर परंतु ज्ञानी प्रवचनकार यांनी भजनात साथ दिली, क्वचितच येतात शहरात मुलाकडे, राहणार पंढरपूर पदवीधर संस्कृत विचायक ज्ञान होते, तसेच ज्ञानेश्वरी वर गाढ अभ्यास होता त्यांचा. नशिबाने ते या भजनात भेटले. आमच्या काही निवडक अभंगानंतर त्यांना आम्ही भजन म्हणण्यास विनंती केली, त्यांच्या मते ते फक्त प्रवचनकार होते त्यामुळे त्यांना भजनी चाल लावणे अशक्य होते, तरीही काही अभंग सादर केले, खूप अनोळखी होते अभंग त्यांचे. तसेच कधी न ऐकलेले असल्यामुळे कोणालाही त्या टाळांच्या आवाजात ते शब्द एकू येत नव्हते, त्यामुळे ते अभंग नाही म्हणू शकलो याची खंत वाटते, त्यातला एक अभंग आमच्यातील एकाला कळला हे नशीब. झालं शेवटी भजन समाधानपूर्वक संपले.

आता आम्ही पुढील भजनाची वाट पकडली, सर्व साहित्य एकमेकांनी खांद्यावर घेतले आणि निघालो, ती वाट थोड्या दुतर्फा झाडांमधून जात होती, त्यात त्या पंढरपूरच्या बाबांनी आमच्या बरोबर भजनाला येण्याचे मान्य केले, त्यांनी आपल्या कथा सुरु केल्या, त्या अंधारामय वाटेत त्यांच्या कथा एकण्यात खूप रस येत होता. त्यांच्या मते त्यांनी संस्कृत शिकले होते म्हणून ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी त्यांना अडचण आली नाही, त्यामुळे मला संकरित शिकण्याची उत्सुकता वाटली, तशी आहेच उस्तुकता. कारण एखादे ज्ञान आपल्याला मिळाले तर ते इतरांना आपण देऊ शकतो व एखाद्या साहित्याचा प्रसार व अर्थ समजावू शकतो. झालं त्या बाबांनी एक प्रश्न विचारूनच टाकला आम्हाला, आमच्यात ५० % तरुण होते, ते म्हणाले या जगात महत्वाचे ३ ऋषी होऊन गेले, सांगा पाहू कोण होते ते आणि प्रथम त्या ऋषींचे प्रकार काय आहेत,  आमच्या मंडळातील काही सुजाण व्यक्तींनाही तो एक यक्ष प्रश्न पडला याचे नवल वाटले, तरीही एकांनी सांगितले देवर्षी... महर्षी परंतु तिसरा प्रकार काय ते सांगू शकले नाहीत, कारण जर चुकीचे बोलले तर पंचाईत व्हायची, मग त्या बाबांनीच सर्व प्रथम ऋषींचे प्रकार सांगितले, ते म्हणजे अनुक्रमे देवर्षी, महर्षी आणि राजर्षी, चला आता यातले देवर्षी कोण आहेत ते सांगा, एकाने सांगून टाकले, देवर्षी नारद, चला दुसरे? महर्षी व्यास अजून एकाने सांगून टाकले, बाबा उत्तरले वा!!! छान, आणि तिसरे? सर्व जन गप्प कारण तिसरे उत्तर येत नव्हते. मग बाबांनी सांगितले राजर्षी विश्वामित्र, जो राजाचा ऋषी झाला तो ऋषी म्हणजे राजर्षी. असा ऋषी जो ऋषी होण्यापूर्वी सत्ताधीश होता, मांस भक्षण करत होता, वध करणारा होता त्याचा झालेला ऋषी म्हणजे राजर्षी, चला मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. त्यानंतर मी ऋषींबद्दल थोडे वाचले तेव्हा कळले कि ब्रह्मर्षी, सप्तर्षी असे खूप प्रकार आहेत ऋषींचे. परंतु त्या बाबांनी जे वेगवेगळे फरक असलेले प्रकार सांगितले ते खूप महत्वाचे होते. तसेच वाल्याचा वाल्मिकी होतो हे लोकांचे संबोधन हि आठवले.
आता आम्ही एका भव्य इमारतीच्या सहवासात आलो, त्या इमारतीत दरवर्षी आमच्या मंडळाचे भजन असते. आम्ही गेलो तेव्हा लहान मुलांचे नाचाचे कार्यक्रम चालू होते. सर्व इमारतीतील व्यक्ती कुटुंबासहित खुर्च्यांवर बसून ते कार्यक्रम पाहत होती. आपली मुले फिल्मी गाण्यांवर कशी नाचतात हे पाहून गहिवरली होती आणि गाणी हि मोठ्या आवाजात, गर्दी खेचून आणत वातावरण नाचवत होती. मी यात अभंगाची तुलना करत होतो. काय खरच या गाण्यांचा आणि अभंगांचा ताळमेळ होईल? छे नाही... मन सारखे म्हणत होते. आम्हाला तो कार्यक्रम संपेपर्यंत वात पहावी लागणार होती, मला यात समस्त वारकरी संप्रदायाचा अपमान वाटत होता.

असो, ती मुले मोठ्या उत्सहाने नाचत होती. इतर लोकांमध्येही उत्साह होता. क्षणार्धात वाटले आणि खराही आहे, किती आनंदी जीवन जगतात माणस या sansarat डुबून जातात, पोहत असतात, त्यांनाच माहित नसत कि ते कुठे पोहत चालत चाललेत. पण जो मार्ग मिळेल तो मार्ग एखाद्या बागेसारखा फुलवून टाकतात, खूप दुखी माणसा बघितली आहेत मी, काही मागच्या गोष्टी विसरणं भागच असता इथे, माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे जर एखाद्याला संस्कृती टिकवायची असेल आणि वटपौर्णिमेला वडाच झाड नाही मिळाल कि वादाची एक फांदी मिळाली तरी त्यावर समाधान मानावं लागतं ना तसं.

चला झाला तो कार्यक्रम संपला व निवेदकाने त्या चहू बाजूंनी असलेल्या इमारतीच्या पटांगणआतील मंचावर उभे राहून जाहीर केले कि, आता अमुक अमुक भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, रात्रीचे ११ वाजले होते, तसे आम्ही मंचावर सामानाची लावणी सुरु केली, सर्व जन अगदी उत्साहाने बसले मध्ये पक्वज वादक होता. सर्व जण त्याच्या भोवती कृष्णाच्या सवंगड्यासांरखे बसले होते. थोड्या वेळाने गजर सुरु झाला आणि भजन सुरु झाले, भजनात कधी गुंग झालो कळलेच नाही, काही अभंग झाल्यावर मागे लक्ष गेले, बघतो तर काय, केवढी मोठी संख्या होती ... खुर्च्यांची. थोड्या वेळापूर्वी झालेली गर्दी भजनात केव्हा नाहीशी झाली कळलेच नाही. लोकांचा अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टीकोन किती वेगळा असतो हे अनुभवले. भजन झाले व काही ४-५ कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर आम्ही परत yayla निघालो, १ वाजला होता त्या दुतर्फा अंधारलेल्या मार्गातून चालताना सर्व जरा शांतच होते, विचार एकाच असावा म्हणून एकाने प्रश्नच केला, प्रश्न कसला वस्तुस्थितीच होती ती. मग त्या बाबांनी यावर चर्चा सुरु केली. त्यांना अजब वाटले, परंतु शहरात असे पाहायला मिळणार हे काही नवल नव्हते. त्यांना लोकांकडून जे अपेक्षित होता ते मिळाल नव्हतं. त्या दत्तजयंतीला दत्त हरवला होता असे वाटू लागले होते. तरी मला त्या बाबांच्या रुपात दत्ताचे दर्शन झाले असेच वाटले आणि शेवटी मी हि म्हणालो "मला हे दत्तगुरू दिसले" त्या बाबांच्या नावाने मी ती दत्तजयंती अशी साजरी केली.

- महेंद्र