Monday, December 26, 2011

समजा कोणी विचारलं की तुम्ही काय करता?

‘काय करावं’ हे माणसाला समजलं नाही तरी एक वेळ चालतं, पण ‘काय करु नये’ हे कळालंच पाहिजे. नाहीतर नको ते होऊन बसतं आणि मग झालेलं खुप नको नको होतं. मी पण तो गांजा ओढण्याचा अनुभव घ्यायला नाही पाहिजे होतं. कारण दारु प्यायल्यावर माणसाचं माकड होतं, तसं गांजा ओढल्यावर त्याचं डुक्कर, हत्ती, गाढव, कुत्र, गेंडा आणि हरीण सुद्धा होतं. गांजा पिऊन मी हत्तीसारखा झुलत झुलत बाहेर आलो तर तिथेच चिखलात पडलेल्या काही वराह कुमारांवर माझा पाय पडला. मग त्यातला एक कुत्र्यासारखा मला चावला. मग मी त्याला गाढवासारखं लाथा झाडल्या. तो गेंड्यासारखा धावुन आला. मग मी हरणासारखा पळुन गेलो. समोरुन येणारा ख-याखु-या म्हशींचा कळप मला दिसलाच नाही. मग मी....

..................मग मी वाचत होतो त्या पुस्तकाचं पान उलटलं.

छे हो... मी कसला गांजा पितोय. व्यसन करायला संधी आणि हिंमत लागते. आम्ही आपले संधीविना चारित्र्यवान. हे गांजाप्रकारण पुस्तकात वाचत होतो. मला जर कुठलं व्यसन असेल तर पुस्तक वाचण्याचं. पुस्तकांशिवायच्या जगाची कल्पनाही मला असह्यच वाटते. पुस्तक तुम्हाला खुप वेगळ्या जगात घेऊन जातात. जे तुम्ही प्रत्यक्षात जगु शकत नाही, ते तुम्हाला पुस्तकं जगवतात. तुमच्याही नकळत तुम्ही त्या पुस्तकातलं एखादं पात्र बनुन जाता आणि मग विसर पडतो सगळ्या जगाचा....!

परवा बसची वाट बघत असंच एका छान पुस्तकात गांजा ओढताना हरवुन गेलो होतो. अचानक कोणीतरी बोललं माझ्याशी आणि मी दचकुन वर पाहिलं. एक तरूण मुलगा, माझ्या हातातल्या पुस्तकाकडे बघत म्हणाला "हि जि बस पकडलीये ती सोडु नकात, मग अशा दहा बसेस सुटल्या तरी चालतील. तुम्हाला हवय तिथे तुम्ही पोहचणारच.... किंवा तुम्ही आधिच तिथे पोहचलाय". ते पुस्तक वाचण्याच्या नादात मी चार बसेस सोडल्यात हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं. गंमत वाटली.... माझ्या स्वतःचीच आणि त्याच्या सल्ल्याची!
पुस्तक घट्ट धरत त्याला म्हणालो की "नाही सोडणार हि बस कधी." तो प्रसन्न हसला.

"काय करता तुम्ही?" - मी विचारलं.

"मी नाट्य मंदिरात डोअरकिपर आहे." - तो.
मी उडालोच. त्याच्या अंगातले कपडे पाहुन ब-याच सधन घरातला वाटला. त्याला तसं विचारलं तर म्हणाला की "खरय... एका चांगल्या कंपनीत ब-यापैकी कमावतोय. पण ते फक्त पोटापाण्यासाठी. माझं खरं वेड, खरं जग म्हणजे नाटक. आधि रोज तिकीट काढुन थिएटरात नाटक बघायला जायचो. मग तिथल्या डोअरकिपर्सशी ओळख झाली आणि त्यांचा ग्रुप जॉइन केला. मग तिथेच डोअरकिपर म्हणुन संध्याकाळी काम करतो. जिवंत राहण्यासाठी कंपनीत नोकरी करतो पण त्यापेक्षा जगण्यासाठी काय करतो हे महत्वाचं. म्हणुन तुम्ही म्हणालात की ‘काय करता?’ तर म्हणालो की मी डोअरकिपर आहे."
मनात म्हणालो की आपलंही असंच आहे की....!

आता इथुन पुढे कोणी विचारलं की ‘काय करता तुम्ही’ तर सांगायचं, "मी पुस्तकं जगतो."

....आणि मग छंदच लागला प्रत्येकाला हे विचारायचा की नोकरी सोडुन तुम्ही जगण्यासाठी काय करता. कंडक्टर, दुकानातला वाणी, आमचा दुधवाला, पानवाला, भाजीवाला, न्हावी, चांभार, पोस्टमन, एक रिक्षावाला, मास्तर, कामावरचे सहकारी मित्र इतकंच काय माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर बसणा-या एका ज्योतिषीलाही तेच विचारलं. दुस-याच्या भविष्यात स्वतःचं वर्तमान शोधणारा तो ज्योतिषी अचानक मला भूतकाळातच घेऊन गेला. जिथे बसला होता तिथली मागची पेटी त्यानी ओढुन घेतली आणि तो खजिन्याचा पिटारा माझ्यासाठी उघडला. हो... खजिनाच होता तो. त्यात बालपणच होतं माझं. कागदात गुंफलेलं.. कागदात कोरलेलं. रस्त्यावरच्या कोणा ज्योतिषाला ओरीगामीचा नाद असेल, असं मला सांगुनही खरं वाटलं नसतं. त्या पेटीतला हत्ती, सिंह, रनगाडा, फुलं, फुलपाखरु, पक्षी, वेगवेगळ्या आकाराच्या खुप सुंदर डब्या, अंगठ्या... काय काय नी काय काय ! लहान मुलासारखा हरवुनच गेलो त्या पेटीत. तो ज्योतिषीही खुप उत्साहात सगळं दाखवत होता. "घरी या एकदा. तुम्हालाही बघायचय ना की मी जगण्यासाठी काय करतो.... सगळं घर भरलय अशा वस्तुंनी." ....त्या गुरुचं आमंत्रण स्विकारलं आणि आणि त्याच्याकडुन ओरीगामीचे काही प्रकार शिकुन पुढे निघालो.

मधेच एक दर्दी दारुडा भेटला. जगण्यासाठी तो काय करत असेल असा प्रश्न पडला नाही. कारण तोंड उघडायच्या आधिच उत्तराचा जोरदार भपका आला. तरी त्याला विचारलंच. म्हणाला, "दोस्तांमुळे असा झालो साहेब. संध्याकाळपर्यंत इमानदारीत काम करतो पण कामावरुन घरी जाताना दारुच्या गुत्त्यापाशी आपला दोस्त गालीब माझी वाट बघत उभा असतो. मग संध्याकाळ चढत जाते आणि रंगत जातं जगणं.... साहेब, त्या मैफ़लींसाठी जगतो मी. अन मधल्या मध्ये ती बिचारी दारु बदनाम होते याचं वाईट वाटतं."
पुढे गेलो तसं, बागेच्या बाहेर कट्ट्यावर बसलेले एक आजोबाही भेटले. आकाशात पसरलेले ढग हवे तसे हलवुन त्यांचे ते सोईप्रमाणे केलेले आकार रंगवत बसले होते. कुठल्याही कॅनव्हॉस किंवा ब्रशशिवाय त्यांनी तिथल्या तिथे एक चित्र काढलं आणि रंगवुनही टाकलं. आणि रंगांनी भरलेली एक संध्याकाळ पिशवीत घालुन घरी घेऊन गेले.... जगण्यासाठी."

घराजवळ आलो तर एक जुना मित्र फार दिवसांनी भेटला. काय बोलु आणि काय नको असं झालं होतं. त्याला म्हणालो की रविवारी भेटुयात का? तर म्हणाला,

"रविवार सोडुन कधिही बोल. हवं तर कामावर दांडी मारुन येतो पण रविवार जमणार नाही. मी दर रविवारी सकाळी वृद्धाश्रमात जातो आणि तिथल्या म्हाता-यांसोबत ब्रेकफास्ट करतो, गप्पा मारतो, गाणी म्हणतो, बागकाम करतो. काही प्रश्न असतील सोडवतो... मग सगळा दिवस तिथेच असतो. त्यांचा विरंगुळा व्हायचा प्रयत्न करतो. काही रविवारी अनाथआश्रमातही जातो. मुलांशी खेळायला, दंगा करायला. त्यांचा दोस्त व्हायचा प्रयत्न करतो."

यानंतर मित्राला ‘तु काय करतोस?’ हे विचारण्याची गरजच राहिली नाही.

चाळीत ढमढेरे बाई भेटल्या. जगण्यासाठी काय करता असं त्यांनाही विचारलं तर म्हणाल्या "लग्नाच्या आधि विचारलं असतंत तर सांगितलं असतं की ‘गाणं आणि नाच’. पण लग्नानंतर एकदा मिस्टर ढमढेरेंनी माझी कला पाहिली आणि त्यांनी एक सौदाच केला माझ्याशी. फक्त दोन साड्या, स्वैपाकघरात नविन ओटा आणि एका मोठ्या पातेल्याच्या बदल्यात मी माझी कला विकली त्यांना. त्यानंतर मग जगण्यासारखं काहीच राहिलं नाही. आता जगत राहते ते त्या दिवसांसाठी जेंव्हा ढमढेरे कामानिमित्त बाहेरगावी जातात आणि मला घरात नाचगाणं करता येतं."

(ह्याच दिवसात चाळीतली लोकं सुद्धा कुठे कुठे बाहेर जातात. त्यांनीही ढमढेरे बाईंशी सौदा करण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळेस बाईंनी आपली कला विकली नाही. असो... )
मित्र-मैत्रिणींनो....

जगण्यासाठी आपण काय करतो हे ढमढेरे बाईंना माहिती आहे.... माझ्यासाठी अजुन असं काय आहे याचा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....

पण तुमचं काय ?

समजा कोणी विचारलं की तुम्ही जगण्यासाठी काय करता? तर काय उत्तर द्याल तुम्ही ?

हात जाईल पोटावर, कारण भुक्कड नोकरीचं
का नाव येईल ओठावर, एखाद्या फक्कड छोकरीचं ?
कलेसाठी जगता तुम्ही का समाजसेवाचा ध्यास घेता ?
खाण्यासाठी जन्म आपला का गाण्यासाठी श्वास घेता ?
काय जगता? कसं जगता?

कळवा..... अगदी बिनधास्त कळवा.... तुमच्या उत्तराची वाट बघतोय....

- धुंद रवी
[ टीप:- हा लेख मला माझ्या नितीन शेडगे या परिचयाच्या व्यक्तीने मेल केला होता, तो इथे प्रसिद्ध केला. ]

Sunday, December 25, 2011

बुद्धीबळ आणि युद्ध

दि. २४ डिसें. २०११

सर्वप्रथम इतिहासातील समर योद्धे, युद्धांगना आणि त्यांच्या कुशल बौद्धिक कामगिरीला मुजरा. बुद्धीबळ हा खेळ खेळताना खूप वेळा प्रश्न पडला खरच बुद्धीबळ या खेळाचा उपयोग वास्तविक युद्धात केला गेला का? खरच का गनिमी कावा करताना शिवाजी महाराजांनी हा खेळ खेळला होता? परंतु त्यांनी गनिमी कावा अत्यंत चतुराईने खेळला आणि त्याचा प्रभाव विरोधकांवर पडला. बुद्धीबळ या खेळाचा इतिहास खूप प्राचीन काळापासून आहे, सुमारे १५०० वर्षापसून या खेळाची चर्चा या जगतात आहे, याची सुरुवात झाली ती भारतात गुप्त साम्राज्यापासून, याच इ.स. ६ व्या शतकामध्ये या खेळला "चतुरंग" म्हणून ओळखले जात होते., नंतर हा खेळ भारतानंतर पर्शिया येथे खेळला जाऊ लागला, पर्शिया वर झालेल्या मुस्लीम सत्तेच्या अर्कामानानंतर मुस्लिमांनी या खेळावर पकड बसवली आणि हा खेळ दक्षिण युरोपात गेला.

चतुरंग म्हणजेच चार भाग (सैन्याचे चार भागात वर्गीकरण) हत्तीदल, पायदळ, रथदल आणि घोडदल. म्हणजेच या खेळातील चाल महत्वाचे भाग अनुक्रमे हत्ती, प्यादे, घोडा आणि वजीर. युद्धात हत्तीचे खूप महत्व होते. त्यामुळे बुद्धीबळातही हत्तीची चाल खूप प्रभावी आहे. हत्ती सरळ उजवीकडे व डावीकडे कितीही घरं जाऊ शकतो. परंतु युद्धात मात्र तो तिरका जाऊ शकतो हा एक फरक आहे. वास्तविक पाहता बुद्धीबळ हा खेळ एखाद्या योध्याच्या मानसिकतेची परीक्षा घेणारा आहे. जर समोरचा स्पर्धक चलाख असेल आणि चाल खेळून तो त्याच्या पुढे नतमस्तक होत नसेल तर योध्याच्या म्हणजेच पहिल्या खेळाडूच्या सहनशीलतेचा अंत होतो., त्यामुळे हा खेळ खेळाडू किती सहनशील आहे याची परीक्षा घेणारा असावा. युद्धामध्ये असे अनेक युद्धे झाली ती काही वर्षे चालली. त्यामुळे कोणता योद्ध हा दीर्घ काळ पर्यंत युध्द करू शकेल हे समजते. प्रत्यक्ष युद्धात महत्वाच्या गोष्टी म्हणजे योध्यांची संख्या त्यायोगे दिवसातून किती वेळ युध्द करावे तसेच हवामान, साथीचे रोग प्रतिस्पर्ध्याची ताकद या व अनेक गोष्टींचा विचार केला जातो. या गोष्टी ह्या सुदृढ मानाने घेतल्या जात असल्यामुळे बुद्धिबळ हा खेळ एक परीक्षा ठरू शकतो.

विजयनगरच्या सम्राटाच्या कारकिर्दीत बुद्धिबळ हा खेळ खूप खेळला जात होता.

राजाची जागा मला खूप कुतूहलाची वाटते कारण राजा हा बुद्धिबळात खूप महत्वाचा म्हणजे जर राजा असेल तर खेळ संपला असे आहे. मानून राजाला संरक्षित करण्यासाठी वजीर, हत्ती, घोडे, उंट व प्यादे यांची झुंबड उडते. का राजा हा महत्वाचा आहे खेळत आणि युद्धातही? हो खर आहे राजा हा जनतेचा आधार स्तंभ असतो. यथा राजा तेथ प्रजा असे म्हटले आहे. एखादे युद्ध डोळ्यासमोर आणा, युद्ध हत्ती घोडे, उंट, तलवारी, तोफा, रक्त, जखमी सैनिक, आणि हिर्यासारखा तेजपुंज असा राजा उभा असतो मैदानात, सर्वांची नजर सेनापती वर असते. काय असेल पुढचा आदेश. त्या आदेशानुसारच ते लढणार, कोणाला नाही कोणाचे विचार. ते फक्त आपल्याला मिळालेल्या शिकवणुकीच्या व युद्ध्कौशल्याच्या जोरावर लढणार. तेवढ्यात एक तलवार येते आणि राजाच्या मानेवरून फिरते. साप साप..... राजाचे धड आणि मुंडके क्षणार्धात वेगळे होतात. आणि बस... शांतता पसरते सर्वीकडे. सैनिकांचे मनोबल क्षणार्धात विरघळून जाते,. कोसळते.... आपला राजा गेला, सर्वस्व गेलं.... आणि मग राजाच्या जागी उभा होतो तो प्रतिस्पर्धी सैन्याचा सेनापती व तो आपला झेंडा तेथे गाढ्तो. असे काही झाले विजयनगरच्या युद्धात. आणि विजयनगरचा ह्रास झाला.

खरं तर या गोष्टीवर चर्चा होणे स्वाभाविक आहे त्या अनुषंगाने मी काही लेख शोधात असताना एक लेख मिळालाच तो म्हणजे "chess and war " त्यानुसार काही प्रश्न विचारले गेले लोकांकडून ते म्हणजे "काय बुद्धिबळ हा खेळ आहे, कि विज्ञान, कि कला" याचे उत्तर कदाचित आपल्याला पुढील लेखात कळेल. स्वीडेन च्या jesper hall यांच्या या लेखात त्यांनी एका संभाषणासह काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते एकदा रेल्वेच्या dinner रूम मध्ये फेर्या मारत असताना एका राखाडी रंगाच्या केसाळ माणसाने एक प्रश्न विचारला "बुद्धिबळ काय आहे?"  त्यांनी त्याला उत्तर दिले पण नंतर काळे कि तो प्रश्न विचारणारा माणूस एक निवृत्त सैनिकी अधिकारी होता. त्या दोघांनी तो पूर्ण प्रवास या चर्चेत घालवला त्यामध्ये त्यांनी आपण कसे बुद्धिबळाच्या सहाय्याचे इतिहासातील मोठी युद्धे सर केली. आणि त्या युध्दाची निति बुद्धिबळावर साकार केली. hall यांनी Cannae चे युध्द उलगडले, त्या युद्दात जनरल हानिबल च्या अधिकारकषेतील कारथाजिनिअस ने रोमन्स ना आपल्या अतुलनीय युद्ध्नितीने कसे चिरडले आणि १९६७ साली झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेशी व त्या विजेत्या स्वीडिश चम्पिअन रोल्फ मार्टेन्स याच्याशी हे कसे संबंधित आहे हे नमुद केले.

मार्टेन्स ने एका नव्या बुद्धिबळाच्या चालीचा शोध लावला त्याचे नाव होते. "Ultra-Hyper Modern Counter Attack" school for black ".हि चाल (छायाचित्रात दिल्या प्रमाणे) दुसर्या महायुद्धातील रशिया आणि जर्मनी ची युद्धनीती दर्शविते. हाहाहा म्हणजे दुसर्या महायुद्धात देखील बुद्धिबळाचा वापर करून विजय मिळवला होता हे सिध्द होते. त्यामुळे जे लोक बुद्धिबळ हा फक्त खेळ आहे असे समजत असतील तर त्यांना माझा इशारा आहे कि हा फक्त एक खेळ नसून एक युद्ध आहे.

अशीच एक कविता बुद्धिबळाच्या पटावरची एका अनामिक कवीकडून सादर

जगाच्या या पटावरती एक प्याद चालत होत,
नजरा चुकवत सर्वांच्या लक्ष्य आपल गाठत होत....
शेवटच्या घरात आल तेव्हा प्याद आता वजीर झाल होत ;,
बेफान ताकत घेऊन राजालाही नाचवत होत,
मात झाली , खेळ संपला पण प्याद आपल्याच नशेत होत ,
नवा डाव मांडला तेव्हा प्याद पुन्हा प्यादच होत. !!!


- महेंद्र

अखेरची रात्र - महाभारत

काल सह्याद्री वाहिनी वर "अखेरची रात्र" हि कथा कार्यक्रमातून काही नामवंत कलाकारांनी साकारली होती. यात श्री कृष्णाची व्यक्तीरेखा श्री. माधव आपटे यासारख्या नामवंत कलाकाराने साकारली होती. या कार्यक्रमातील वातावरण एवढे गंभीर होते कि, ती महाभारताची आदली रात्र प्रेक्षकांसमोर जिवंत केली होती. ती रात्र तो अंधार इ. कृष्णाचे व कुंतीचे विचार त्यांचे संभाषण, धर्म अधर्म याबाबत खूप युक्तिवाद दाखवला आहे. धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे समजायला खूप कठीण, कृष्णाच्या कला या कुन्तिलाही समजल्या नाहीत. त्या रात्री कृष्णाने स्वतः कुंतीला कारणाकडे पाठवले, का तर द्रौपदीला त्याची धर्मपत्नी बनवण्याचे आमिष दाखवण्यासाठी, त्यायोगे तरी तो युध्द विराम जाहीर करेल, कुंतीच्या मनाची अवस्था छिन्न विच्छिन्न झाली होती, तिने कृष्णाला दोष दिला आणि म्हणाली, तू त्यावेळी जो खेळ झाला तो पुरे नाही? कारणाने भर दरबारात द्रौपदीला वेश्या म्हटले ते विसरलास? परंतु कृष्णाच्या मनात वेगळेच होते, कारण त्याला भविष्य माहित होते. त्याने कुंतीला समजावले, शेवटी सत्य हे सत्यच असते, कर्ण उदार मनाचा आहे, उदार माणसाच्या एका कोपर्यात उदारता असतेच आणि ती जागृत व्हायला वेळ लागत नाही. कर्ण समजेल आणि तसा वागेल, काय कर्ण तुझा नाही? का तुला त्याला भेटण्याची आतुरता नाही? ,, कुंती भावनाविवश होऊन कर्णाकडे गेली. कर्णाने तिचे स्वागत केले. व एवढ्या वर्षानंतर येण्याचे कारण विचारले. तीलाही कर्णाला भेटण्याची आतुरता झाली होती. काही संवादानंतर ती त्याला म्हणाली अर्जुन आणि तू मला सारखेच आहात, तसेच तू अर्जुनापेक्षा जास्त जवळचा वाटतोस, परंतु मी धर्माच्या बाजूने आहे, आणि तुझा पराभव अटळ आहे, आणि हेच सत्य आहे, नंतर कर्णाच्या लक्षात आले कि, आपण कसे द्रौपादिबरोबर आपल्याच भावजयी बरोबर वाईट वागलो, याची त्याला लाज वाटली,

तात्पर्य कृष्णाची खेळी खरी ठरली, त्याने कर्णाच्या आतील पुत्र तथा भाऊ जागा केला होता, आणि त्या रात्री त्याला अजून भावविवश करून युद्धात हरण्याचा अजून एक मार्ग खुला केला होता, कर्ण हि कुंतीला म्हणाला, मी अर्जुनाला घाबरत नाही, परंतु त्याबरोबर जो कृष्ण आहे त्याला घाबरतो तसेच त्याबद्दल इर्षा आहे, कारण अर्जुनाची शक्ती दृश आणि कृष्णाची शक्ती हि अदृश आहे, तो भूतकाळाला कधीच क्षमा करत नाही, वर्तमान आपल्या हातात ठेवतो, आणि भविष्य तसेच घडते.

खालसा व शीख धर्माबद्दल थोडेकाही:-

एके दिवशी टि.व्ही बघत असताना डिस्कवरी वर शीख धर्म आणि खालसा याबद्दल एक कार्यक्रम लागला होता. त्यामुळे मला या धर्माबादल कुतूहल वाटले. हिंदू धर्माप्रमाणेच हा वैभवशाली धर्म आहे. त्याची परंपरा आणि इतिहास हा मोठा आहे. हा धर्म मला हिंदू धर्माच्या जवळ असल्याची कारणे आहेत. महत्वाचे म्हणजे हा धर्म हिंदूचा एक प्रमुख अंग आहे तथा तो हिंदू धर्मातून तयार झाला आहे. इतर कारणांमध्ये या धर्मातील माणुसकी आणि परोपकारी विचारसारणी हि आहे. सदर कार्यक्रमात सुवर्ण मंदिराबद्दल सांगण्यात आले. या सुवर्ण मंदिरावरील स्वर्ण आच्छादन दर वर्षी लकलकीत केले जाते. काही विशिष्ठ व्यावसायिक कारागिरांकडून त्यांचा रखरखाव केला जातो. परंतु त्यासाठी ते अजूनही प्राचीन पद्धतीचा अवलंब करतात. त्यांच्या मते हि पद्धती वापरल्यास सोन्यावर त्याचा सोन्यावर काहीच दुष्परीणाम होत नाही. त्यामुळे शिखांचे हे पवित्र तीर्थस्थळ एकजुटीमुळे खूप संरक्षित राहिले आहे हे कळते.

शीख धर्माचे पहिले गुरु गुरुनानक हे आहेत. यांचा जन्म १४६९ मध्ये लाहोर जवळ असलेल्या तलवंडी गावात झाला. त्यांनीच शीख धर्माची स्थापना केली. शीख धर्मात ज्या व्यक्तींचा समावेश होता. ते बहुतेक करून हिंदू व मुस्लीम या धर्मातील होते. गुरुनानक यांनी "सतनाम" च्या प्रचाराला सुरुवात केली, हिंदुस्थान, श्रीलंका, अरबस्थान आणि इराण या देशात यात्रा केली. यात्रा संपल्यानंतर ते पंजाब प्रांतात करतारपूर गावात स्थायिक झाले. काही काळानंतर त्यांना हातात शस्त्रे घेणे भाग पडले. त्याचे कारण म्हणजे या धर्मावर इतर राज्यकर्त्यांची आक्रमणे. त्यामुळे शिखांनी स्वरक्षणासाठी हाती तलवारी घेतल्या. प्रत्येक घरातून एक व्यक्ती दान केले जात होते. मग हा/हि व्यक्ती तलवार घेऊन समाज रक्षणासाठी आपले पूर्ण जीवन दान करत असे. (राष्ट्रीय स्वयंसेवक दल हे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे युध्द नीतीचे) मग शिखांनी या युध्द कौशल्याचा उपयोग "खालसा" मध्ये केला.

१६ व्या शतकात गुरु अंगद गुरु झाला. त्यांनी "गुरुमुखी" लिपीचा शोध लावला. त्यानंतर या पंथात दोन पंथ निर्माण झाले. ते म्हणजे "उदास" पंथ आणि "नानक" पंथ शीख समाजात मूर्ती पूजा अमान्य असल्यामुळे "ग्रंथसाहेब" ची स्थापना झाली. (माझ्या मते हिहि एक मुर्तीपुजाच आहे).

शिखांवर अत्याचार चालू झाल्यानंतर बादशहा जहांगीर ने आरोप केला कि गुरु अर्जुनदेव यांनी त्याचा पुत्र खुशरो याला पळून जायला मदत केली आणि त्याने गुरु अर्जुनदेव यांची हत्या केली. या नंतर शीख समाज खूप भडकला. त्यांनी मग दोन्ही पंथ एक करून सर्वांना एका छताखाली आणले. यालाच "खालसा" म्हणतात.

शिख धर्माची महत्वाची तत्वे म्हणजे सर्व धर्मातील विस्थापितांना एकत्र आणुन काहि तत्वे जोपासणे. माझ्या मते त्याकाळी असलेल्या हिन्दु समाजाने बहिष्क्रुत केलेल्या लोकांना हा धर्म आश्रय दिला असावा. तसेच या धर्मातील तत्वांनुसार समाजसेवा हि केली जाते. स्वर्ण मंदिरात दररोज कितीतरी लोकांना भोजन दिले जाते. परंतु नविन दिक्षा घेतलेल्या तरुणांना युध्ध कौशल्य हि शिकविले जाते. जेणेकरुन या धर्मावर परकिय आक्रमणे होणार नाहित. त्यासाठी तलवार, भाले, काठ्या. इ. चा वापर केला जातो. त्यामुळे हा धर्म हिन्दु धर्माच्या जवळचा आहे. व भारतातील यांचे हिंदु धर्माबरोबर फ़ारसे वाईट संबध नाहीत.

सदर लेखात काही चुका आढळल्यास माफ़ी असावी.

आली माझ्या घरी हि दिवाळी.........

एस.टी. stand वरून गाडी सुटली. सोडायला आलेल्या सर्वांनी हात दाखवला. "घरी पोहोचल्यावर फोन कर" असं सारखं बजावून संगत होती सर्व. सर्वांनाच एक स्मित छान स्मित देत होती ती आणि निमुटपणे हो हो करीत होती. एकदाची गाडी सुटली आणि मार्गली लागली. तसा ३ तासांचा प्रवास होता. पण ते ३ तास तिला ३ महिन्यांसारखे वाटत होते. घाईच तेवढी झालेली तिला. कारणच तसं होत. लग्न होऊन १० वर्षे झाली होती तरीही ती माहेरची पायरी चढली नव्हती या दरम्यान ती. कितीही म्हटल कि मुलगी हि परक्याच धन तरी आपली पूर्वीची आणि न तुटणारी नाती कशी विसरू शकेल ती. नाही जाऊ म्हटल सासरच्यांनी माहेरी मग त्यांना इतरांना न दुखवणारी ती तरी कशी तोडेल मन एखाद्याचे. पण यावेळी भावनाविवशतेच्या उंबरठ्यावर उभी होती. कुठेतरी या सर्वाना जुमानुन आपल्या मनाचं ऐकायचं तिने ठरवलं होत. एस. टी. मधेच ती झालेलं प्रकरण आठवू लागली. माहेरी जाण्याचा विचार करणे खूप कठीण होते. पण झाला वाद सासरी. तिने एकदा मागणी टाकली सासूबाईंपुढे

"जायचं म्हणतेय माहेरी या दिवाळीत"

पतीच्या हि कानावर घातलं तिने. सासू बाईंनी घर जणू डोक्यावर घेतल

"तू जाणार माहेरी आणि घरची कामं कोण करणार, तुझी आई येणारं आहे का? इथे मला एकटीला दिवाळीची कामं करायला लावतेस व्हय!, तू तिथे जाऊन आराम कर आणि मी इथे कसबसं कामं करू तेही दिवाळीच्या ऐन वेळी? तुझ डोक ठिकाणावर आहे का, घरात आपण दोघीच त्यात दिवाळीचा हा पसारा, आपल घर म्हणजे पंचक्रोशीत नावाजलेलं घरात बाईमाणूस नाही मग लोक नाव ठेवायला कमी करणार आहेत का?" झालं सासू बाईंना हे मोठ कान मिळाल आणि त्यांनी तिच्यापुढे हे ठेवल. आता तिची अवस्था बघावीशी वाटत नव्हती. नात्यांमध्ये गुंतून पडली होती बिचारी.
शेजारच्या माधुरी बरोबर तिचं पटत होत. माधुरी हि तिच्या शेजारच्या घरातील एकुलती एक सून होती. १ वर्षापूर्वी तीच लग्न झालं होत. महत्वाचं म्हणजे प्रेमविवाह होता. माधुरी च्या माहेरी त्या विवाहाला विरोध होता पण तिने कोणाचेही एकले नाही. तसेच तिच्या सासरच्यांनी हि विरोध केला. पण नवरा हि होता हट्टी, लग्न करायचा त्यांनी निर्धारच केला होता आणि शेवटी दोन्ही घरांच्या संगनमतान झालं एकदाच लग्न पण एका अटीवर. माधुरीच्या वडिलांनी तिला बजावून सांगितले "लग्न करतेस खरं आमच्या विरुद्ध पण यापुढे परत या घरात पाउल ठेऊ नकोस" माधुरीच्या मनाला अस्वस्थ करणारी ती अट होती. शेवटी माधुरीने आपला पती हाच परमेश्वर मानून सर्वांचा निरोप घेतला होता. माधुरीचं आणि या कथेच्या नायिकेचं खूप पटत होतं. दोघीही एकमेकिंशिवाय कुठेही जात नव्हत्या, दोघींच्याही घरी खूप दरारा होता त्यामुळे त्यांना काहीतरी कारण सांगूनच घराबाहेर पाडाव लागत होतं.
अशी हि माधुरी, तिने हि गोष्ट माधुरीला सांगितली., सांगताना माधुरीला खूप गहिवरून आले कारण तिला तिचं माहेर आठवलं होतं तिच्या बोलण्यात, पण क्षणार्धात माधुरीने तिचे लक्ष नायिकेकडे वळवले व तिचे एकू लागली. माधुरीलाही तिच्या सासूचा स्वभाव आवडत नव्हता., माधुरी लगेच म्हणाली "काय गं, हि तुझी सासू सुधारणार तरी कधी" मग नायिकेने माधुरीला सांगितले "आता काही नाही मी माहेरी जाणार म्हणजे जाणारच" तिचा निर्णय ठाम होता धनुष्यातून बाण सुटावा तसा. तिच्या मनात एक झ्वालामुखीच जन्माला येऊन वाढत होता. पतीजवळ ती जरा मोकळेपणाने बोलत असे इतरांच्या तुलनेने. घरात वाद नको म्हणून ती शांतच राहायची. तिचा हा गुण शेजारचेही लोक बोलून कौतुक करायची. एकदा तर शेजारच्या आजींनी टोमणा मारूनच टाकला "ह्या घरात सुनेने मागील जन्मी खूप पाप केलं असेल म्हणून तिला असं सासर मिळाल आणि मागील जन्मी सासूने खूप पुण्या केल बाई कि तिला अशी चांगली सून मिळाली" शेवटच सुनेबद्दल बोलताना एक स्मित हास्य देत कडकडून बोटं मोडली होती.

थोडे दिवस गेले, झालं नायिकेने एकदा वेळ बघून आपले बोलणे सर्वांसमोर मांडायचे ठरवले. दुपारची वेळ होती. सर्वजण जेवायच्या तयारीत होते. सासरे हात पाय धुऊन खुंटीला टॉवेल टांगणार तेवढ्यात नायिकेने सासू बाईंबरोबर वाद करायला सुरुवात केली, सर्वांना ऐकायला जाईल या स्वरात ती म्हणत होती. एवढ्या मोठ्या आवाजात ती प्रथमच आपले म्हणणे मांडत होती. ती म्हणाली

"या घरात १० वर्षे झाली संसार करून आई, पण अजून एकदाही मला माहेरी जाऊ दिलं नाही तुम्ही. काय मला बाकीची नाती नाहीत? तुमची मुलगी येते न दर वर्षी मग तेव्हा आठवत नाही कि माझ्याही आईवडिलांना वाटत असेल मला भेटावसं. खूप सहन केल मी या घरात, हे घर आहे कि........"

बस्स... पुढचा शब्द बोल्याआधी तिला आपण खूप बोललो याची जाणीव झाली. तिचे हात थर थर कापत होते. भूक विसरली होती ती. जीव घाबराघुबरा झाला होता, खूप हिम्मत केली होती तिने, एवढे दिवस दाबलेला आवाज बाहेर निघाला होता, आणि खूप हलकेही वाटत होते. क्षणार्धात तिला प्रश्न पडू लागले कि काय आपण मोठी चूक केली का? पण झाले त्यावर तिचे समाधान होते. सासू बाई तर अवाक्क होऊन बघतच राहिल्या तिच्याकडे त्यांचा थोडा अपमान झालाच होता. सासरे तर खुंटीवर टॉवेल लावत होते परत काढत होते. कारण त्यांचा लक्ष होतं तो स्वयंपाकघरात ., ते ऐकून त्यांनाही तिची कीव आली होती, तिच्याबद्दल आपुलकी वाढली होती. मग पतीने तिला खडसावले जरा पण ती शांतच होती आता. आपले म्हणणे सर्वांसमोर तिने आणले होते. तिला आता गरज नव्हती काही बोलायची.. तरीही तिचं डोक तापलेलं होत. त्यातच तिने पतीलाही सांगून टाकले" ते काही नाही मी जाणार म्हणजे जाणारच माहेरी या दिवाळीत"

झालं त्यावेळी जेवतानाही कोणी काही बोललं नाही. तो दिवस हि शांत गेला, सर्वजण आपापली कामे करीत होते. दुसऱ्या दिवशी माधुरी बरोबर ती अंगणात बसून काही मासिके चाळत होती. नेहमीप्रमाणे त्या दोघींचे विनोद चालू होते. त्या छायाचित्रात एक नाती जीन्स घालून ऐटीत उभी होती. तिच्या कडे बघून लगेच माधुरी म्हणाली " ए तुझ्या सासू बाईंना हि या दिवाळीत अशी जीन्स गिफ्ट दे मग खूष होऊन गावभर मिरवत फिरतील तुझा नावाने हा हा हा हा" आणि दोघींनीही हसायला सुरुवात केली. तेवढ्यात सासरे येताना त्या दोघींनी बघितले. दोखींचा चेहरा अगदी गंभीर झाला होता. ते त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले आणि हसत म्हणाले "काय कोणता असा विनोद वाचलात आम्हालाही सांगा" ती म्हणाली "नाही बाबा असंच आमचं" मग सासर्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, "काय मग कधी निघणार माहेरी, हिच्याकडून कळलं कि माहेरी जायचा मनात आहे तुमच्या" ती म्हणाली हो जायचं तर ,मनात आलं होतं. पण आपल्या सर्वांच्या परवानगीशिवाय कसं जाणे होईल (तिचा आता माहेरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता, तरीही तिने स्मितहास्य देत आदरार्थी भावाने हे म्हटलं). "जाऊ शकता पण परत लवकर यायचं बघा" असे म्हणत सासरे आत निघून गेले. शेवटचे वाक्य ते जरा गांभीर्याने म्हणून गेले.

आज ती खूप खूष होती, त्याच क्षणी तिने माधुरीला हातात हात घालून गोल फिरवायला सुरुवात केली., तिचं आनंद गगनात मावेना. माधुरीही तिच्या आनंदात सहभागी झाली होती. माधुरी म्हणाली मग "हम्मम्मम्म आता काय, "अजि सोनियाचा दिनू , वर्षे अमृताचा घनु," असे गाणे गाऊन "शेवटी जिंकलीस हा बाजी"असे म्हणत तिने तिचे स्वागत केले,. आणि "चाल माझी कामे आहेत खूप म्हणून हसत हसत ती तिच्या घरी गेली. माधुरी अशी अचानक का गेली हे नायिकेला कळलेच नाही. माधुरीचा राग आला होता तिला, खूप बोलायचे होते माधुरीशी. शेवटी तीही घरी गेली, आज ती खूप आनंदात होती.

कथेच्या नायिकेला दोन मुले होती, मुलगा ६ वर्षाचा आणि मुलगी ३ वर्षाची होती. मुलगी खूप हुशार होती मुलापेक्षा, अगदी आईसारखीच कोणतेही कामं असुदेत आई बरोबर कामं करायला लागणार आणि तेही सर्वात पुढे, भांडी घासणे , कपडे धुणे जेवण करणे नाही जमत तरी "मी करते न" असे म्हणत केविलवाणा प्रयत्न करणार. गुटगुटीत अशी छोटासा फ्रोक घातलेला आणि घरभर बडबडत हिंडणारी अशी होती. मुलगा तर खूप शांत विचारले तेवढेच बोलणारा, पण अभ्यासात हुशार होता, वर्गात नेहमी पहिला यायचा, तसा अभ्यासही घ्यायची ती. दोन्ही मुलेही "आई कुठे जाणार आपण? खूप घुम्म्म जाणार आहे का" असं सारखी विचारत होती. मग तीही त्यांच्याच स्वरात सांगायची "हो आपल्याला कि नाई खूप घुम्म जायचं आहे आजी आजोबांकडे, मग आता गप्प बसून खेळ बाहेर जाऊन" असं म्हणत तिने त्या दोघांना बाहेर आणलं. आणि काही फळीवरची खेळणी काढून दिली.

माहेरी जाताना दोन्ही मुलांना ती घेऊन जाणार होती, मुलांना सुट्टीही होती शाळेत,. पण पतीला येणे जमणार नव्हते काही महत्वाचे कामं होते त्यामुळे बाहेरगावी जाणे भाग होते तिच्या पतीला. झालं मग तिघे जाणार होते माहेरी तिच्या. ती आणि तिची दोन मुलं. तिने माहेरी जाण्याची तयारी सुरु केली. तिची धावपळ सुरु झाली होती, मुलाला शाळेत सुट्टी होती तसेच दोन्ही नातवांना घेऊन ये अशी इच्छा माहेरी व्यक्त केली होती. सासू बाईनिहि तयारीत मदत केली. काही फराळ दोघींनीही बनवला होता तो बांधून दिला होता. नायिका तर आपल्याच नादात कामे करीत होती.

कंडक्टर ने बेल वाजवली एका stand वर आणि एस.टी. मध्ये विचार करीत असलेल्या नायिकेला आपण एस.टी. मध्ये आहोत याची जाणीव झाली. हा सर्व प्रसंग टी आठवत होती. बाजूला बसलेली मुले खिडकीतून बाहेर पाहत एकमेकांबरोबर वाद घालत होती.तिने पर्समधून पैसे काढले तिकीट काढण्यासाठी आणि तिकिटे काढली. २ तासाचा प्रवास अजून उरला होता. कसाबसा १ तास गेला. लग्न झाल्यावर परीतीची वाट ती पहिल्यांदाच पाहत होती. माहेरच्यांना भेटण्यास खूप आतुर झाली होती. खिडकीतून बाहेर नजर गेली तिची. हे आकाश, पक्षी, झाडे, नद्या सर्व तिचे जणू स्वागतच करीत होते असा तिचा भास होत होता. ती आपल्या मधेच खूप खूष होती.

गाडी आली एकदाची गावातील बाजारात, तसा तिला लहानपणीचा काळ आठवला, गावातील सर्व याच बाजारात यायचे बाजाराला. गावाच्या बाजारपेठेत गाडी आली आणि रिकामी असलेली गाडी कधी भरली याचा पत्ताच तिला लागला नाही. कारण गावात जाणारी वेळेची ती गाडी होती. सकाळचे सुमारे १० वाजले होते. सर्वजण बाजार करून परतत होते घरी., नायिकेला या माणसात कोणीतरी ओळखीचे दिसेल याचा पूर्ण विश्वास होता. तसे तिला १ नाही २ नाही तर चक्क तिचे सापडले. तिची बालपणीची मैत्रीण शीला, शेजारच्या पण बाजूच्या वाडीतील क्षारदा काकू आणि बालपणीचा एक मित्र बबन. हे सर्व भेटल्यावर तिला खूप गहिवरून आले. खूप वर्षानंतर या सर्वांना बघितले होते तिने. कडकडून भेटली होती ती त्यांना. ते तिघे तिला बघून आश्चर्य व्यक्त व्यक्त करू लागले. बबन हा खूप साधा होता. त्याला मुलांबरोबर खेळायला खूप आवडत होते. तसा तो मुलांबरोबर मस्करी करू लागला. ती मुलेही आता कोणीतरी नवा खिलाडी भेटला या आनंदात त्याच्याबरोबर खेळू लागली बबन ला लहानपणी खूप ताप आला होता. त्यामुळे त्याची बौद्धिक क्षमता कमी होती. नायिकेच्या लग्नात त्याने खूप काम केले होते. अगदी घरातल्यासारखे, कोणाचीही कामे तो निस्वार्थी पणे करत होता, गावातील सार्वजनिक कार्यक्रमात त्याचा खूप मोठा सहभाग होता. तिच्या लग्नाच्या वेळी तो तिचे समान घेऊन एस.टी. stand पर्यंत आला होता. तिला त्या दिवशीचा तो आताही आठवत होता. लांब टी.शर्ट, गुडघ्यापर्यंत pant असा त्याह पेहराव नेहमीचा.मग तिला तिच्या लग्नाचा क्शन आठवला. लग्नाच्या मांडवात आई वडिलांना निरोप देण्याचा तो प्रसंग होता.त्या काळीच्या कोणत्याही स्त्रीला समजलं असेल काय गत झाली असेल तिची. लहानपणापासून ज्यांच्यासोबत राहिली, मोठी झाली, त्यांना सोडायची वेळ आली होती तेव्हा. तिला कदाचित जाणीव नसावी कि ती ज्या घरात जाणार आहे ते कदाचित तिला माहेरी जाण्याची परवानगी देतील. म्हणून ती खूप रडत होती. ते घर ती माणसे ती विसरू शकत नव्हती. ते नाजूक क्षण ती विसरू शकणार नव्हती, सर्व जण एस. टी. stand वर जमा झाली होती. बस सुटायची वेळ झाली, ती बसमध्ये बसली, मागच्या खिडकीतून तिने सर्वांना हात दाखवला, त्यात तिच्या मैत्रिणी ज्यांबरोबर ती भांडली होती, शेजारी, आई वडील होते. सर्वांनी हात दाखवला आणि एका वळणावर ते दिसेनासे झाले, आता परत ती याच वळणावर येणारं होती., सर्वांना कडकडून भेटायला.

मग शीला आणि क्षारदा काकू यांचे नायिकेशी बोलणे चालूच होते. आता पर्यंत काय काय झालं, मग कुणाला किती मुलं, कोण कुठे आहे सध्या या सर्व गोष्टी झाल्यावर नायिकेने आपल्या माहेरच्या घराबद्दल विचारणा केली. "काय हो क्षारदा काकू आमच्या घरातले सर्व कसे आहेत", क्षारदा काकू जरा टाळूनच बोलल्या."हो बरे आहेत कि" (क्षारदा काकूंचा आणि नायिकेच्या भावाच्या पत्नीशी वाद झाला होता, त्यामुळे त्या एकमेकींच्या घरी फारशा जात नसत). नायिकेला क्षारदा काकूंच्या उत्तराची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नव्हती. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तिला, तिच्या लग्नानंतर तिच्या भावाचं लग्न झालं होतं, त्यामुळे तिने काकूंना प्रश्न विचारला "आलेली सून हि कशी आहे हो?" क्षारदा काकू उत्तरल्या "आता काय बोलणार, खोटं कशाला सांगायचं, तुझ्या लग्नानंतर घर अगदी बदललं हो" तुझी भावजय म्हणजे कैकया, काय घर होतं पूर्वी, आता एक माणूस सुद्धा जात नाही तिथे. अगं कोणी घरात गेल्यावर त्याची उठबस, विचारपूस तरी केली पाहिजे कि नाही. हि बया गावभर हिंडत असते. आणि आली तरी कोणाकडे लक्ष नाही. आणि तुझ्या आई बाबांचा सर्वांसमोर झालेला अपमान मला तरी सहन होत नाही गं, मग कशाला मी जातेय तिथे, उगाच वाद कशाला, आता तूच जाऊन बघ तुझ्या डोळ्यांनी, तुझा भाऊ हि आजकाल शांतच असतो. तरी एक मुलगी झाली आहे तुला तर माहीतच असेल. आता अजून काय नवीन सागायचा राहिलंय, आणि तू पण बदललीस हो, आज एवढ्या वर्षानंतर आठवण आली का तुला आमची" असं म्हणत काकूंनी आपले म्हणणे पूर्ण केले. तोच नायिका उत्तरली "असं नाही आहे, मी तर नेहमी उतावीळ असते पण माझे सासर मला परवानगी नाही देत होते. यावेळी कशीतरी मी आले आहे दिवाळी निमित्त. ते ऐकून क्षारदा काकूनाही तिचं म्हणणं पटलं. काकुनी काचकूच करत तिला प्रश्न विचारला "काय गं तुला सासरी जाच तर होत नाहीये ना." ती म्हणाली "नाही नाही असं काही नाही.खूप चांगले आहेत सर्व म्हणून तर त्यांनी मला परवानगी दिली. खरं म्हणजे सासरी कोणीही नाही, मी आणि माझ्या सासू बाईशिवाय त्यामुळे जाता येत नाही कुठे." असं म्हणत तिने सासरची बाजू सावरली.
थोडावेळ शांतता झाली, घरातील सर्व कळल्यावर तिच्या मनात वादळ निर्माण झालं, तिला आता घरी जाण्याचं वेडंच लागलं होतं. अचानक गाडी थांबली तिची उतरण्याची वेळ झाली होती.सर्व लगबगीने उतरले. बसमधून बाहेर पडताच तिचा पाय मुरगळला, झालं चप्पल तुटली होती. तिने आपल्या चपला काढल्या जमिनीचा तो स्पर्श तिला आपलासा वाटू लागला, वातावरण एकदम आपले आपले वाटू लागले. तिने मुलांना घेतले व घरी आली. एवढ्या वर्षानंतर घराचे वातावरण खूप बदलले होते. ती घरापर्यंत आली होती,. घराबाहेरील जागेत नजर जाताच ती स्वतःशीच म्हणाली. इथे तर खूप झाडे होती., मी लावलेली खूप फुलझाडे गेली कुठे? , काय माझ्या लग्नानंतर रागावून निघून तर नाही गेली ना? असा बालिश प्रश्न तिला पडला. तिची आई बाहेर अंगणात काहीतरी वळत घालत होती. खूप वय झालं होतं आईचं. आईला बघताच तिने हाक मारली. आईलाही खूप आनंद झाला. दुरूनच तिने तिला भेटण्यासाठी आतुरता व्यक्त केली. दोघींनीही एकमेकींना मिठी मारली. अश्रू आवरणे आता शक्य नव्हते. आईने तिला विचारले "काय गं, आज तुला आठवण आली" मग थोड बोलल्यावर आईचं लक्ष मुलांकडे गेलं, तसं तिने त्यांना लाड करून घरात नेलं. सर्व आत गेले तेव्हा तिला तिच्या भावजयीचे म्हणजेच भावाच्या पत्नीचे दर्शन झाले. खरं म्हणजे तिला पहिल्याच क्षणी तिच्या बरोबर पटेल कि नाही याची शंका वाटायला लागली. तिचा भावजयीचा स्वभावाच तसा होता. तिने तिचे स्वागत न करता सरळ आत निघून गेली होती. एखाद्याशी मिळून समजून घेणे तिच्या भावजयीच्या स्वभावात नव्हतेच, पण त्या वेगळ्या स्वभावाच्या घरातील इतर लोकांना तिचा कुठेतरी त्रास होत होता हे नायिकेला समजले. तसा तो दिवस एकमेकांच्या भेटीत व बोलण्यात गेला रात्री भाऊ घरी आला तशी ती त्याला बिलगली आणि खूप बोलू लागली त्यालाही खूप आनंद झालं होता.

काही दिवस गेले. एके दिवशी जे व्हायला नको होते ते झाले. काय होणार? अहो वाद. तिच्या भावजयीला वाद केल्याशिवाय जेवण जात होते का. मग नायिकेने हि माघार नाही घेतली, तिच्या समोर तिने तिच्या आई वडिलांचा अपमान केला होता, एका शुल्लक कारणावरून. थोड्या वेळाने सर्व शांत झाले, नायिकेला अशा वादाची सवय नव्हती आणि तिच्या आई वडिलांनाही. तिला विचार पडला कि कसे हे लोक दिवस काढत असतील. आणि त्यालाही काही उपाय तिला दिसत नव्हता., संध्याकाळी ती डोक शांत करायला बाहेर पडली, तिची नेहमची जागा गावाबाहेरील नदी.

ती आपल्या मुलांना घेऊन नदीवर आली, मुलांनाही खूप आनंद झाला. ती तिला सोडून खेळायला लागली. नदीच्या काही पत्रात पाणी कमी होते. नदी हि तिची आवडती जागा होती., लहानपणी ती खूप वेळ या नदीवर येऊन बसत असे. नदीच्या पाण्यातील शिंपले तिला खूप मोहक वाटायचे. तसे आजही ती नदीच्या पाण्यात उतरली आणि शिंपले जमवू लागली. ती अगदी तिच्या लहानपणी गेली होती. मग थोड्या वेळाने ती भानावर आली आणि मुलांसोबत हिरव्या गार गवतावर येऊन बसली. तरी मूळे मस्ती करीतच होती. मनात विचार चक्र सुरु झाले. आपली रक्ताची नाती सोडली तर तिला आता माहेर पेक्षा तिचे सासरच खूप सुसह्य व आनंदी वाटत होते. थोडे कठोर होते पण आपलेपणा वाटत होता तिला तिच्या सासरी. ती सासर आणि माहेर याची तुलना करू लागली. तिला आपल्या आई वडिलांना घेऊन सासरी घेऊन जावे असे वाटायला लागले. पण ते शक्य नव्हते. आई वडिलांचा हा जाच तिला अस्वस्थ करीत होता. एवढ्या दिवसापर्यंत ती आपल्या सासरच्यांना बोल लावीत होती. पण आता तिला तिचे सासर खूप आपुलकीचे वाटू लागले. तिला तिचेच काळात नव्हते. सासरची खूप आठवण येत होती. माहेरच्या घराबद्दल असेलेली एवढ्या दिवसाची ती आर्तता, आपुलकी कमी झाली होती. चांगल कोण आणि वाईट कोण हे तिला कळणे मुश्कील जाहले होते, तिची द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. आहे त्यात समाधान मानण्याचा निर्णय तिने घेतला होता आता.

दिवस हळूहळू मावळत होता. वेळ हळू हळू सरत होती. सावल्याही आपल्या जागा बदलत होत्या.हळू हळू अंधार होत होता. तिला सर्व आठवत होते.तिचे सासू-सासरे, पती, माधुरी, आई-वडील, भाऊ, त्याची पत्नी. ती एका उंबरठ्यावर उभी होती. दोन घरातील तो उंबरठा होता. ते सर्व तिचे होते. तिला हाताखाली दोन पंख निर्माण झाल्यासारखे वाटले. आपल्या दोन्ही पंखांखाली सर्वांना आधार द्यावा असे तिला वाटू लागले. सूर्य मावळत होता, ती फक्त तेथेच त्या सूर्याकडे त्याला निरोप देत एकटक पाहत बसली होती.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

खरे इमानदार कोण?

रोज मर्राच्या जीवनात कुठेतरी ऐकायला मिळते कि विश्वासघात झाला बेईमानी झाली, शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास बघितला तर "दगा दिला" हा शब्द अजून कानात गुमगुमत राहतो. माझ्या मते सर्व विश्वात माणूस हा असा प्राणी आहे ज्यावर आपण विश्वास ठेऊ शकत नाही. असे नाही वाटत? तर कारण काय असावे, कोणी म्हणेल कि माणसाला विचार स्वातंत्र्य आहे, स्वतःचे मन आहे, कोणी म्हणेल अहो माणसाला संस्कार योग्य रीतीने मिळाले नाही तर कदाचित मनुष्य असे वागत असेल. कोणी म्हणेल जर समोरील व्यक्तीकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर बदल घेण्याच्या वृत्तीने व्यक्ती विश्वासघात करून त्याला त्रास देत असेल. कारण काहीही असो, हजारो मनांची हजारो विश्लेषण शेवटी काय मनुष्य हा सृष्टीतील सर्वात बुद्धिवान आणि दगाबाज प्राणी आणि तो कधीही कोणाचाही विश्वासघात करू शकतो किंवा देईल याचं नेम नाही.

पण मी जेव्हा इतर प्राण्यांची तुलना मनुष्याशी करतो तेव्हा असे कळते कि इतर प्राणी हे खूप विश्वसनीय असतात. आपला सभोवताली अनेक पाळीव प्राणी आहेत, त्यातील सर्वात इमानदार आणि विश्वसनीय प्राण्यांचा विचार करता "कुत्रा" हा प्राणी समोर उभा राहतो. तीक्ष्ण डोळे, संशयी नजर, कान वर टवकारलेले, तोंडाबाहेर लोंबत असलेली जीभ, असा प्राणी मनुष्याला खूप मदतशीर आहे. इतिहासात डोकावले कि शिवाजी महाराजांच्या "वाघ्या" कुत्र्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. हा कुत्रा खूप शूर होता, कुत्रे हे जंगली प्राण्यांची शिकार अत्यंत चोखपणे करीत असत, ते वाघाला हि भारी पडत असत असे इतिहास सांगतो, कोल्हापूरला गेल्यावर शाहू महाराजांच्या राजवाड्यात जरूर जावे, तेथे काही छायाचित्रात त्याकाळातील शिकारी जीवन रेखाटले आहे, त्यात एका छायाचित्रात काही वाघ आणि काही कुत्रे मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजेच त्या वाघांची शिकार त्या कुत्र्यांनी केली, परंतु अशा इमानदार कुत्र्यांचा बळी गेलेल्या कुत्रांचे फोटो बघताना वाईट वाटते, या गोष्टीवरून असे लक्षात येते कि, कुत्रा हा मालकाशी एवढा इमानदार आहे कि आपले प्राण हि देऊ शकतो. पण कुत्रा हे सर्व आपल्या मनाने करतो ka? त्याला काय गरज वाघांशी झुंज घेलायची., याचे एकच कारण त्याची मालकाशी असलेली इमानदारी, प्राणापलीकडे एखाद्यावर श्रद्धा ठेवावी ती कुत्र्यांनी. त्यांना नसते स्वतंत्र विचारसरणी, बुद्धीमत्ता, पण अशी कोणती गोष्ट आहे कि त्यांना एवढी इमानदारी करण्याची गरज भासावी, ती म्हणजे त्यांमध्ये असलेला एक मुलभूत गुण. जो माणसात अमावस्या पौर्णिमेला येतो. आणि कधी जातो याचं मुहूर्त तोच बांधतो.

असा हा कुत्रा हा प्राणी कित विश्वासू आणि इमानदार असावा. या बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच. आयुष्यभर एका मालकाशी एकनिष्ठ राहून त्याची सोबत न सोडता अगदी मालक मूर्च्छ येऊन पडल्यानंतरही काही काळ तेथेच गहिवरून बघत राहिलेला, आपला मालक का असं करीत आहे. कदाचित हे त्याला कळतंच नसेल. पण मालकाचे प्राण जाऊनही खूप काळ त्याच्या शेजारी बसून मालक शुद्धीवर येण्याची वाट पाहणारा असा हा प्राणी, आणि आता असे वाटते कि तो अद्यापही वाट पाहत आहे कि मनुष्य अजून शुद्धी वर येत नाही, आमची इमानदारी त्यांना कधी लाभेल.

पण खरच मनुष्य हा प्राणी एवढा इमानदार आणि विश्वासू आहे? हा प्रश्न पडणे गैर नाही. एखाद्याला दिलेला शब्द न पाळणे हे तर सामान्य झाले आहे, काही काळ असा होता कि शब्द हा प्राणापलीकडे होता. आता तर शब्दांचे विश्छेदन करून त्याचे १२ वे १३ वे कधी केले जाते सांगता येत नाही. आपला विशासघात कोण करतो असा प्रश्न येतो तेव्हा हेच माणूस बोलतो कि ज्यावर आपण विश्वास ठेवतो तो विश्वासघात करतो. मग विश्वासच ठेऊ नये कोणावर. मग विश्वास ठेवावा कोणावर? खरच अशा लोकांची निर्मिती कर्तुत्रीम्रीत्या केली जाईल संशोधन करून?, का बिघडतो समाज? का पळत नाहीत लोक शब्द, का फसवणूक करतात? आणि अशा फसवणूक करणार्यांचे समर्थनही केले जाते. आपल्या भोवती खूप असे राजकारणी काही ढोंगी समाजसेवक, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, न्यायाधीश अहो इतकेच नव्हे तर स्वतःचे आई वडील हि, वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केल्याच्या तसेच आईने जन्म्जात्या मुलीला यमसदनी पाठविलेल्या बातम्या आहेत. मग तुम्हीच विचार करा खरे विश्वासू कोण हे प्राणी कि मनुष्य?

माझे तर हेच म्हणणे आहे,
घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून,
झाले गेले गंगेला मिळाले,

यापुढे कोणी कोणाला म्हटले, "काय रे कुत्र्या" तर मला ज्याला म्हटले आहे त्याला एक पदवी दिल्यासारखे वाटेल :)